Wednesday, June 1, 2011

विद्वानाची* लक्षणे (पुष्प पहिले)

भूमिका :
    हा लेख मार्गदर्शनपर व्हावा, अशी आमच्या संपादकांची (म्हणजे आमची) इच्छा आहे. कोणालाही मार्गदर्शन करण्यासाठी त्या विषयातले कळावे लागते, हा एक सार्वजनिक गैरसमज आहे. आपल्याला ज्या विषयातले काडीचेही ज्ञान नाही, त्या विषयावरही बोलता येते. फक्त त्यासाठी विद्वान असावे लागते. आजकालची सामाजिक  परिस्थिती पाहता, प्रत्येकाला कोणत्याही विषयावर बोलता येणे ही एक प्रातिनिधिक गरज बनली आहे. (फक्त पुण्यातच नाही, कोठेही.)  अभ्यास करून विद्वान होणे हे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच शक्य होत नाही. त्यामुळे झटपट विद्वान होण्याची सोय ही एक अत्यावश्यक गरज झाली आहे. ही गरज भागवणे हे  आम्ही आमचे सामाजिक उत्तरदायित्व समजतो. तद् नुषंगाने आणि काही रचनात्मक कार्य करावे या हेतूने प्रेरित होऊन आम्ही ही मार्गदर्शन पर लेखमाला लिहित आहोत. त्या लेखमालेचे हे पहिले पुष्प आपल्याला अर्पण करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.

विद्वान म्हणजे:
           तर मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी, "विद्वान म्हणजे काय?" हे स्पष्ट करणे योग्य ठरेल. आम्ही स्वतः ही विद्वान आहोतच, परंतू "आम्ही असे", "आम्ही तसे" हे  सांगण्यापेक्षा, "विद्वान कसे" ते आम्ही सांगतो. (काय विनयशिलता आहे, वा! वा!). समजायला सोपे जावे म्हणून आम्ही ही लक्षणे संवाद स्वरूपात देत आहोत. सर्वसामान्य वाचकाला सुद्धा समजावे म्हणून संवाद बोली भाषेत लिहिलेला आहे.
           खाली दिलेला "विरुपाक्षनेत्र" आणि "शाल्वरुद्र" यांच्यातला संवाद वाचा. ("विरुपाक्षनेत्र" आणि "शाल्वरुद्र" ही नावे मोठी असल्यामुळे सोयीसाठी आपण त्यांना अनुक्रमे "पांड्या" आणि "सुभान्या" म्हणू.)**
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पांड्या उवाच:हे सुभान्या, विद्वान कैसा चाले, कैसा बोले, हे कथावे मजप्रति ...

सुभान्या उवाच:
toilet का? त्या तिकडे, उजव्या बाजूला...

पांड्या उवाच: toilet नाय रे भाऊ ,
विद्वान. म्हणजे "लै भारी" माणसाची characteristics विचारतोय मी...

सुभान्या उवाच: तुझ्या XXX, असं मराठीत बोल ना...

पांड्या उवाच: ठीके, यापुढे विचारीन, पण आता कर भुंकायला सुरुवात...

सुभान्या उवाच:पांडबा, विद्वान ओळखण्यासाठी काही ठराविक अशी कसोटी नाही रे. पण तुला समाजात विद्वान म्हणून ओळखले जायचे आहे का? तर मी मार्गदर्शन करतो.

पांड्या उवाच:ठीक आहे कर, पण सहसा चाऊस वापरावी लागणार नाही, असं बोल.

सुभान्या उवाच:सर्वप्रथम पांडबा कोणालाही झेपत नाहीत अश्या कवितांच, चित्रपटांच कौतुक करायला सुरुवात कर.
सगळ्या लोकप्रिय गोष्टींना नाके मुरडायला शिक.
दुर्बोध चित्रांच तोंड फाटेस्तोवर कौतुक कर.
सगळ्यांना आवडते त्या गोष्टींवर सडकून टीका कर.
आपण करत असलेली टीका आपल्यावरच उलटते आहे असा संशय आल्यास, प्रत्यक्षात निरर्थक असलेली परंतू लै भारी वाटणारी दोन तीन वाक्ये तयार ठेव...

पांड्या उवाच:अशी पण वाक्ये असतात? उदाहरणे दे ना!

सुभान्या उवाच:ठीक आहे ही वाक्ये लक्षात ठेव.
1) थ्री इडीयट्सच्या दिग्दर्शकास, रंगमंचीय अभिव्यक्तीला आवश्यक असलेली कलात्मक अनुभूती घेताना, व्यक्तिगत अलिप्तता जपता आलेली नाही.
किंवा,
2) लिओनार्डो दा व्हिन्चीने काढलेल्या मोनालिसाच्या चित्रातून त्याच्या सामाजिक उत्तरादायीत्वापेक्षा त्याची व्यक्तिनिष्ठता प्रकर्षाने जाणवते.
किंवा,
3) हिमेश रेशामियांच्या गाण्यावर टीका करणाऱ्या संगीतातल्या तथाकथीत जाणकारांना; त्यांच्या आवाजातली उत्कटता समजत नाही, हिमेशजी त्यांच्या आवाजामधून भांगारवाले, कल्हईवाले यांसारख्या कष्टकरी समाज घटकांचं प्रतिनिधित्व करतात. अर्थात हे समजण्यासाठी सामाजिक जाणीवा सुस्पष्ट असायला हव्यात.
वगैरे वगैरे...
......
पांड्या - पांड्या काय झालं तुला? असे केस का उपटतो आहेस? अरे अरे थांब दगड नको मारूस...लागेल!

पांड्या उवाच: ल्ये गयी, द्यील म्येरा, मनच्यली...
खल्यीबल्यी खल्यीबल्यी खल्यीबल्यी..
मुंबई - ढोपरगाव बुद्रुक, डेक्कन किंग एक्स्प्रेस,
अपने निर्धारित समय पर platform नंबर
"पंधरा हजार सातशे ब्याण्णव पूर्णांक दोन दशांश" पर आ रही है ...
याद आ रही है.. त्येरी याssद आ रही है...
कलमाडी निर्दोष आहेत, हे विरोधकांच कारस्थान आहे....
मी आहे एक शून्य आकाशाच्या आकांक्षांना ग्रासलेलं...
मूळव्याध आणि गुप्तरोगावर आयुर्वेदिक इलाज केला जाईल, संपर्क साधा...
संपर्क, संपर्क.. पंक सम्पर्के कमळ का भिकारी, धूली सम्पर्के रत्न का भिकारी, तशी तूही मग मजसवें कशी भिकारी???

सुभान्या उवाच :वाचवा वाचवा ...
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    
          तर वाचकहो, वर दिलेला उद्बोधक संवाद वाचून, विद्वान या शब्दाबद्दलच्या आपल्या संकल्पना स्पष्ट झाल्या असाव्यात अशी अपेक्षा आहे. समर्थांनी लिहिलेली जशी मूर्खांची  लक्षणे आहेत तशी विद्वानांचीही बरीच लक्षणे आहेत. (आहे, दोन्हीमध्ये फरक आहे, उगीच फालतू शंका काढू नका.) परंतू ती याच लेखमालिकेच्या दुसऱ्या पुष्पामध्ये देत आहे.
इत्यलम.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
* विद्वान हा शब्द या ठिकाणी आमचे गणिताचे मास्तर आम्हाला वापरत असत त्या अर्थी वापरला आहे.

** प्रश्न : पहिल्यांदा अभद्र नावे वापरून नंतर त्यांनाच पांड्या आणि  सुभान्या म्हणण्या ऐवजी, थेट तीच नावे का वापरली नाहीत?
उत्तर क्र. १: आमची मर्जी!
उत्तर क्र. २: त्यांची खरी नावे "विरुपाक्षनेत्र" आणि "शाल्वरुद्र" अशीच आहेत, परंतू विरुपाक्षनेत्राचे संपूर्ण नाव "विरुपाक्षनेत्र पांडूरंग लांडगे" आणि शाल्वरूद्राचे पूर्ण नाव  "शाल्वरूद्र सुभानराव कामठे" असे असल्याने शाळेत मुले त्यांना अनुक्रमे पांड्या आणि सुभान्या असे म्हणायची.
उत्तर क्र. ३: भारी भारी नावे वापरणे हेही एक विद्वानांचे लक्षणच आहे. 

Saturday, May 28, 2011

लिहिण्यास कारण की...

लिहिण्यास कारण  की ...
बरेच दिवस ब्लॉग लिहायचं ठरवत होतो इतके दिवस या मराठी 'ब्लॉगविश्वात' (हा आणखी एक आंग्लोद्भव समास, thanks पु. ल.) वाचनमात्रच होतो. अनेक रथी महारथींचे सुंदर सुंदर ब्लॉग्ज, त्यांची लेखनशैली वगैरे पाहून मलाही लिखाणाची सुरसुरी यायची. परंतू स्वतः लिहिलेले लेख वगैरे वाचून पाहिल्यावर ती जगबुडीच्या अफवांसारखी विरूनही जायची. (यालाच "परखड आत्मपरीक्षण" का कायतरी म्हणतात म्हणे). पोटापाण्यासाठी घरापासून लांब आल्यावर बराच मोकळा वेळ मिळायला लागला. खरं तर  हे वाक्य म्हणजे फुक्कटचा माज आहे, घरी असताना टाईमपासचा प्रोब्लेम नव्हता, कट्ट्यावर कधीही गेलं तरी चार दोन गंडलेले जीव तेथे असायचेच. असो, तर त्या टाईमपासला पर्याय म्हणून सर्व दिग्गजांची क्षमा मागून हा ब्लॉग सुरू करत आहे. आणि ब्लॉग वर प्रकाशित झालेल्या साहित्याचं मूल्यमापन रद्दीवाले करू शकत नाहीत, हेही एक कारण आहेच! माझी ही लुडबुड खपवून घेण्याएवढी मायमराठी सहनशीलही आहे. जमेल तसे लिहित राहीनच. आणखी एक म्हणजे हा ब्लॉग आणखी एका मित्रासोबत लिहिण्याचा विचार आहे. त्याच लिहिण्याच कारण तो लिहिलच, पण वाचकांच्या शिव्या दोघांनाही विभागून जाव्यात हा त्यामागचा सुज्ञ हेतू आहे.

हे झालं खर कारण, आता लई भारी वाटू शकणार कारण पण लिहून ठेवतो (नंतर उगीच विसरायला नको)

क्षणक्षण या जगण्यामधला,
धुंदपणाने चुंबित गेलो...
दिक्कालाचे पाश तोडूनी,
तीमीरावरती चालून गेलो... 
क्षितिजावरचा सूर्य पाहूनी 
दिवाभितांना तुडवीत गेलो...
उपेक्षा अन धिक्काराच्या;
ठेचाही मज इथे लागल्या, (प्रश्न: इथे म्हणजे कोठे?  उत्तर: फालतू प्रश्न नकोत, पुढे वाचा.) 
ठेचांचीच आताशा नशा चढतसे,
तद नशेचीच तर मी ही,
गाणी गाउनी गेलो...

(ओक्के बॉसं, मान्य करू की हे वरती लिहिलेलं सगळ, तुला होत, पण त्याचा आणि ब्लॉग लिहिण्याचा काय संबंध? "मी हे करीत गेलो", "मी ते करीत गेलो", स्वतःपुढे किती दिवे ओवाळून घेशील, लेका?)
असो, वरच्या आठ दहा ओळी अशक्य फालतू आहेत, असं माझं पुनः वाचानांती मत बनलंय. (त्या मी लिहिलेल्या असल्याने सहाजिकच आहे म्हणा.) असो, पण फालतू  असली तरी ती कविता तशीच ठेवतोय (हो, वाटत नसलं तरी कविताच आहे ती). कारण एकतर ती 'क्ष' पासून सुरू होते. अंताक्षरी खेळणाऱ्या पब्लिकची या "क्ष " मुळे कायम गोची होते. (आता ते "ळ " चं कोणीतरी मनावर घ्या राव.)
असो. जगण्याचा प्रत्येक क्षण कसा जगला, हे सांगता येण्याएवढे क्षण आलेतच कोठे आजून आयुष्यात? उगीच गुगल फुकट जागा देतंय म्हणून थापा कशाला मारा? आणि  नशेची गाणी कसली आली आहेत? मायला, इथे पूर्ण शुद्धीत असताना सुद्धा दोन ओळी धड म्हणता येत नाहीत. (किंबहुना त्या ठेच लागल्यामुळे फोडलेल्या किंकाळ्याच  वाटतात.)

असो. नमनासाठी एवढ तेल पुरेसं आहे!