Showing posts with label लिहिण्यास कारण की.... Show all posts
Showing posts with label लिहिण्यास कारण की.... Show all posts

Saturday, May 28, 2011

लिहिण्यास कारण की...

लिहिण्यास कारण  की ...
बरेच दिवस ब्लॉग लिहायचं ठरवत होतो इतके दिवस या मराठी 'ब्लॉगविश्वात' (हा आणखी एक आंग्लोद्भव समास, thanks पु. ल.) वाचनमात्रच होतो. अनेक रथी महारथींचे सुंदर सुंदर ब्लॉग्ज, त्यांची लेखनशैली वगैरे पाहून मलाही लिखाणाची सुरसुरी यायची. परंतू स्वतः लिहिलेले लेख वगैरे वाचून पाहिल्यावर ती जगबुडीच्या अफवांसारखी विरूनही जायची. (यालाच "परखड आत्मपरीक्षण" का कायतरी म्हणतात म्हणे). पोटापाण्यासाठी घरापासून लांब आल्यावर बराच मोकळा वेळ मिळायला लागला. खरं तर  हे वाक्य म्हणजे फुक्कटचा माज आहे, घरी असताना टाईमपासचा प्रोब्लेम नव्हता, कट्ट्यावर कधीही गेलं तरी चार दोन गंडलेले जीव तेथे असायचेच. असो, तर त्या टाईमपासला पर्याय म्हणून सर्व दिग्गजांची क्षमा मागून हा ब्लॉग सुरू करत आहे. आणि ब्लॉग वर प्रकाशित झालेल्या साहित्याचं मूल्यमापन रद्दीवाले करू शकत नाहीत, हेही एक कारण आहेच! माझी ही लुडबुड खपवून घेण्याएवढी मायमराठी सहनशीलही आहे. जमेल तसे लिहित राहीनच. आणखी एक म्हणजे हा ब्लॉग आणखी एका मित्रासोबत लिहिण्याचा विचार आहे. त्याच लिहिण्याच कारण तो लिहिलच, पण वाचकांच्या शिव्या दोघांनाही विभागून जाव्यात हा त्यामागचा सुज्ञ हेतू आहे.

हे झालं खर कारण, आता लई भारी वाटू शकणार कारण पण लिहून ठेवतो (नंतर उगीच विसरायला नको)

क्षणक्षण या जगण्यामधला,
धुंदपणाने चुंबित गेलो...
दिक्कालाचे पाश तोडूनी,
तीमीरावरती चालून गेलो... 
क्षितिजावरचा सूर्य पाहूनी 
दिवाभितांना तुडवीत गेलो...
उपेक्षा अन धिक्काराच्या;
ठेचाही मज इथे लागल्या, (प्रश्न: इथे म्हणजे कोठे?  उत्तर: फालतू प्रश्न नकोत, पुढे वाचा.) 
ठेचांचीच आताशा नशा चढतसे,
तद नशेचीच तर मी ही,
गाणी गाउनी गेलो...

(ओक्के बॉसं, मान्य करू की हे वरती लिहिलेलं सगळ, तुला होत, पण त्याचा आणि ब्लॉग लिहिण्याचा काय संबंध? "मी हे करीत गेलो", "मी ते करीत गेलो", स्वतःपुढे किती दिवे ओवाळून घेशील, लेका?)
असो, वरच्या आठ दहा ओळी अशक्य फालतू आहेत, असं माझं पुनः वाचानांती मत बनलंय. (त्या मी लिहिलेल्या असल्याने सहाजिकच आहे म्हणा.) असो, पण फालतू  असली तरी ती कविता तशीच ठेवतोय (हो, वाटत नसलं तरी कविताच आहे ती). कारण एकतर ती 'क्ष' पासून सुरू होते. अंताक्षरी खेळणाऱ्या पब्लिकची या "क्ष " मुळे कायम गोची होते. (आता ते "ळ " चं कोणीतरी मनावर घ्या राव.)
असो. जगण्याचा प्रत्येक क्षण कसा जगला, हे सांगता येण्याएवढे क्षण आलेतच कोठे आजून आयुष्यात? उगीच गुगल फुकट जागा देतंय म्हणून थापा कशाला मारा? आणि  नशेची गाणी कसली आली आहेत? मायला, इथे पूर्ण शुद्धीत असताना सुद्धा दोन ओळी धड म्हणता येत नाहीत. (किंबहुना त्या ठेच लागल्यामुळे फोडलेल्या किंकाळ्याच  वाटतात.)

असो. नमनासाठी एवढ तेल पुरेसं आहे!